Tuesday, August 28, 2018

लसूण

लसूण

आपल्याला माहित असलेला उग्रवासाचा कंद म्हणजे लसूण हा लसूण अत्यंत औषधी आणि गुणकारी आहे.अगदी हृदय रोगपासून ते पोटात होणारा गॅस पर्यंत. लसूण उपयोगी असतो.त्याने पदार्थाला चव तर येतेच पण माणसाला वात विकारा पासून. दूर नेणाऱ्या लसणाची गोष्ट अत्यंत रोचक हे
               
होय गोष्ट,कथा काहीही म्हणा.लसूण हा अमृतगुणी मानतात.सर्व साधारणपणे अमृत म्हटले की गोड,मधुर,असे शब्द आठवतात.मग लसूण या प्रकारात येत नसताना अमृतगुणी कसा
             
त्याचे असे आहे.एकदा देवांचा राजा इंद्र आणि त्याची पत्नी गप्पा मारत मारत अमृत प्राशन करीत होते.त्या ओघात शचीदेवीनी जरा चार पच घोट अमृत जास्तच प्राशन केले.आधीच शचीदेवी  देवांची राणी त्यात इन्द्रप्रिया प्रकृतीने नाजूक साजूक त्यातूनच अमृताचे अतिपान झालेले.
               
त्यांचे पोट बिघडले.त्यांना अतिसार आणि वमन (म्हणजे उलट्या आणि जुलाब) होऊ लागले.
     
त्या अतिसारा पेक्षा वमनाने त्या हैराण झाल्या होत्या. त्यांना होणाऱ्या वांत्यांची उबळ तेवढी जोरात होती की ते पाणी स्वर्गातून थेट पृथ्वीवर उडे.त्यावेळी त्याचे थेंब ज्या भागात पडले त्या भागात लसूण उगवलेला होता त्यावर अमृत पडल्याने तो अमृतगुणी झाला पण उलटीवाटे अमृत पडले म्हणून उग्रदर्प त्याला येऊ लागला.
अशी ही लसणीची निर्मिती पृथ्वीवर झाली.
                
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Saturday, August 25, 2018

स्तोत्र वाङमय

स्तोत्र वाङमय
 
भारतीय वाङमयाचा आत्मा म्हणजे स्तोत्र गायन नित्यपठणा साठी अथवा पूजेच्या वेळी मंत्र म्हणून गुणगुणताना,  विशेषतः  संध्याकाळच्या वेळी जी म्हणण म्हणायची पद्धत आहे.त्यात आबालवृध्द या वाङमयाशी परिचित असतात.अगदी लहान वया पासून स्तोत्र पठनाची सुरवात भिमरूपी या स्तोत्राने होत असते.पुढे मग गणपती स्तोत्र,नवग्रह स्तोत्र,रामरक्षा,इत्यादी अनेक स्तोत्रांचे आयुष्यात आगमन होते. नित्यपाठ,परवचा आणि म्हणणे या त्रयिने बालपण समृद्ध होत असते.
                   
स्तोत्र हा शब्दच संस्कृत मधील स्तु =स्तवन करणे,प्रार्थना करणे या धातू पासून तयार झाला आहे.स्तोत्रामधे इष्ट किंवा आराध्य देवतेचे स्तुतिपर श्लोक असतात.ती छंदोबद्ध. म्हणजे बहुतेक करून अनुष्टुभ,त्रिष्टुभ अशा अंगभूत लय ताल असलेल्या परिचित छंदात असल्यामुळे गेय असतात.त्यामुळे पाठांतरासाठी सहज सोपी असतात आणि बाल वाणीला उच्चारणाचे वळण देऊन बोबडेपणा पळवून लावणारी ठरतात.
         
सर्वसाधारणपणे स्तोत्राचे तीन विभाग पडतात 
         
१) आरंभ किंवा मंगलाचरण
 
यात नेहमीच श्री गणेशाय नमः। या चरणाने सुरवात होते .किंवा ओम् कार उच्चारण करून पठनाला सुरवात होते त्या नंतर सदर स्तोत्र कोणत्या वृत्तात आहे,त्याचा रचयिता ऋषी तसेच त्यात कोणत्या देवतेची स्तुति केली आहे.आणि पठनफलाच्या बंधनासाठी किलकोच्चारण असा मजकूर असतो.
     
२) देवतेचे ध्यान वर्णन किंवा नामावली
 
या विभागात ज्या देवतेचे स्तुतीगान असेल तिच्या शारिरीक सौंदर्याचे आणि रूपाचे वर्णन केलेले असते.अर्थात सगुण साकार. मूर्ती बद्धरुपाचे प्रत्ययकारी वर्णन असते
 
३) स्तवन किंवा गुणगान
 
या विभागांतर्गत कवी वेगवेगळ्या श्लोकांच्या माध्यमातून इष्ट देवतेची स्तुती करतो.थोडक्यात वेळप्रसंगी कविला  त्याच्या इष्टदेवतेचा कसा प्रत्यय येतो किंबहुना कवीची त्या देवतेचे कडे पाहण्याची दृष्टी येथे सुस्पष्ट स्वरूपात दिसून येते
 
४) फलश्रुती
 
 विभाग स्तोत्र समाप्तीची सूचना असते.फलश्रुती मधे पाठकाला देवतेने काय द्यावे म्हणजेच पाठकाच्या देवतेकडून काय अपेक्षा आहेत .हे स्पष्ट पणे नमूद केलेले असते.
         
अशी ही सुलभ,सुरस स्तोत्रे  चारप्रकारची असतात.
 
 १) नाम स्तोत्रे
 
या प्रकारात सहस्त्रनामावली,अष्टक,दशक  अशाप्रकारची स्तोत्रे अंतर्भूत असतात.यात देवतेची विविध नामे छंदोबद्ध केलेली असतात. हा नामजपाचा प्रकार असून देवाचे नाम मनात इच्छा ठेऊन घेणे.ज्यायोगे देवाने पाठकाची इच्छापूर्ती करावी 
 
२) दुःख निवारक. किंवा मोचक स्तोत्रे
 
यात भक्तीभाव प्रधान असल्याने देवाने आपले दुःख दूर करावे अशी आळवणी असते
 
३) कामनापूर्ती स्तोत्रे
 
याप्रकारच्यास्तोत्रातून देवतेने पाठकाला  आपत्यप्राप्ती,धनधान्य ,विद्या प्राप्ती करण्यात सहाय्य करावे म्हणून देवाची आळवणी करतात. अशा प्रकारचे पठन हे काम्य म्हणजे मनात इच्छा धरून केले जाते. इच्छापूर्ती झाल्यावर देवतेची पूजा करून नैवेद्य समर्पित करून कृपादृष्टी ठेवण्याची विनंती करतात.
 
४) रक्षा स्तोत्रे किंवा  कवच
 
यात देवतेने आपल्या बरोबर जगद्र्क्षण करावे सर्वांचे कल्याण करावे अशा प्रकारची प्रार्थना केलेली असते.
स्तोत्र वाङमयाचा समाज जीवनात अंतर्भाव. म्हणजे "कलौ तद् हरिकीर्तनात्" या उक्तीचा प्रत्यय असतो.उच्चारण शुद्धता येणे,स्वरयंत्रची नित्य शुद्धता  आणि स्मरण दोषांचे निवारण हे स्तोत्र पठनाचे व्यावहारिक उपयोग आहेत.
               
स्तोत्रे  म्हणजेच सूक्ताचे सुलभ,सर्वग्राही रुप असते.त्याची भाषा ओघवती आणि प्रवाही असते.गेयता हा त्याचा प्रमुख गुण असल्याने ती सर्वतोमुखी सहजपणाने  होतात. तसेच ती उच्चसूरात गायली जात असल्यामुळे वातावरण भारून टाकण्याची शक्ती या वाङमय प्रकारात आहे.
     
हे वाङमय प्रादेशिक भाषांमध्ये ही विपुल प्रमाणात आढळते.
 
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Monday, August 20, 2018

चारित्र्य आणि व्यक्तीमत्व

चारित्र्य आणि व्यक्तीमत्व
 
 नेहमीच्या व्यवहारात आपण चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व हे वापरतो. माणूस स्वच्छ चारित्र्याचा उमद्या व्यक्तीमत्त्वाचा आहे 
 
काय आहेत हे शब्द. इंग्रजीत आपण PERSONALITY म्हणजे व्यक्तीमत्व व CHARACTER म्हणजे चारित्र्य हे सर्वसाधारण अर्थ आपण समजत असतो.पण खोलवर अर्थ पहाता
               
चारित्र्य म्हणजे सद्गुण अंगी बाणवणे हेतुपुरस्सर वाईट गोष्टी दूर लोटणे. मनाला बांध घालून फक्त आणि फक्त चांगल्या,उत्तम गुणांचा ध्यास घेणे. तर
 
               व्यक्तीमत्व म्हणजे  polished behavior. वागणुकीतील उत्तमता. जेणे करून
 
मार्दव,दाक्षिण्यसारख्या गोष्टी आपल्या वागणूक,वावरणे यातून दिसाव्या लागतात. थोडक्यात सांगायचे तर शिष्टाचार संमत वावरणे.आपल्या मूळस्वभावाला हेतुपुरस्सर अडवून केलेले आचरण अशी व्यक्तीमत्वाची ढोबळ व्याख्या करता येईल
 
याला पंचतंत्रात नितीशास्त्र म्हटले आहे. माणसाच्या आचरणाचे शस्त्र. ज्यात कसे /काय बोलावे.कसे हसावे,अगदी बसावे कधी व कुठे केव्हा हसावे कसे हसावे ज्यातून आपल्या मनातील विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत अधोरेखित अर्था सह पोहोचतील याचा विचार म्हणजेच व्यक्तिमत्वाचा विचार.
               
बहुतेक वेळा आपण व्यक्तीमत्व म्हणजे माणसाची शारिरीक ठेवण असा संकुचित अर्थ घेत असतो.म्हणजे त्याची उंची,वर्ण,नाकडोळे पण केवळ इतकेच व्यक्तीमत्व नसते. तर त्या व्यक्तीची बरोबरीच्या,कनिष्ठ,व वरीष्ठ व्यक्तीशी असलेली वागणूक ही त्याच्या व्यक्तीमतत्वाचा आरसा ठरते.
                       
व्यक्तीमत्व,आणि चारित्र्य या संकल्पनांचे मानसशास्त्रा नुसार  विभाग पाडण कठीण वाटत जरी असल तरी अशक्य नाही.
   
स्वभाव हा मूलतः म्हणजे जन्मजात असतो पण आलेले अनुभव,कौटुंबिक,पार्श्वभूमी आणि समाजातील पत, यावर. माणसाचा स्वभाव ठरतो.  कालमान,परीस्थिती नुसार त्यात बदल अपेक्षित असतात. किंबहुना जेव्हा हे बदल होतात ते बरेचदा कायमस्वरूपी असतात.पण चिडणे,रागावणे, अगदी रडणे या हंगामी गोष्टी कधीमधी हजेरी लागते.पण ह्या गोष्टी हंगामी च असतात.त्या कालांतराने निघून जातात.
               
येथेच व्यक्तिमत्व विकासाची सुरवात होते.त्याबरोबर समाजात वावरणे हा हेतू धरून आपल्या वागणुकीला मॅनरिझमची जोड देवून सौजन्यपूर्ण (कित्येकदा वरवरची वाटणारी) वागणूक. हे विकसित व्यक्तिमत्वाच गमक आहे.
             
या मागचा मानसशास्त्रीय दृष्टीकोन म्हणजे नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करणे
"A word "IMPOSSIBLE"  HIM SELF SAYS" I M POSSIBLE " या नुसार वागणे  हे मुख्य. त्या अनुषंगाने शिस्त,संवाद,माणसे जोडण्याची पद्धत,क्षमा,-शासन-करणे, या गोष्टींचा सकारात्मक उपयोग म्हणजे व्यक्तीमत्व विकासाची सायको थेरपी आहे. 
   
जसे म्हणतात ना "चांगल्या चालीन चांगल्या बोलीन वाहवा जगात होई"
             
व्यवस्थापन शास्त्रातील. 'Four c's' हा सिद्धान्त सगळ्या प्रकारे वापरून स्वतःची उर्जितावस्था प्राप्त करून घेणे. आणि  समाजच्या प्रगतीचा विचार करणे  म्हणजे चारित्र्य आणि व्यायक्तिमत्व विकासाचा योग्य संगम याचे उत्तम उदाहरण म्हणजे "श्री रतन टाटा."
             
पौराणिक आणि ऐतिहासिक काळात हा विषय सर्व सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेर होता पण राजाच्या शैक्षणिक अभ्यास क्रमात तो नेहमीच असे.
             
आजकालच्या काॅर्पोरेट जगासारखच वातावरण हे राजाच्या दरबाराचा अविभाज्य भाग. असे. त्याला रोज आपल्या कामाच्या निमित्ताने हजारो व्यक्तीना  भेटावे लागते.त्यातील काही गोष्टी,व्यक्ती इतक्या विचित्र असतात की त्यांच्याशी बोलताना कपाळावर आठी उमटू न देणे अगदी अशक्य असते.तसेच काही संताप जनक विषय जे अत्यंत ज्वलंत असतात.येथे राग संताप येणे अपरिहार्य. असते.अशावेळे साठी व्यक्तीमत्वावर संस्कार करून त्याला आपल्या राग,लोभ,आनंद,दुःख या विकारावर ताबा ठेवणे योग्य कालमान,परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यक्त होणे आणि योग्य शब्दात व्यक्त होणे म्हणजेच व्यक्तीमत्व होय. थोडक्यात काय तर नकारात्मक गोष्टींचे सकारात्मक रुपांतर करून आपल्यायोग्य वातावरण निर्मिती करणे होय.
             
भारतीय संस्कृतीने याच गोष्टींची शिकवण धर्माच्या शर्करावगुंठीत गोळीतून दिली.कारण माणसाच्या मानसिकते नुसार त्याला  मरणपूर्व जीवन मरणोत्तर हवे असल्यास पुण्य करीत रहावे.म्हणजेच काय तर अनुशासित आणि  सकारात्मक जगणे होय पण धर्म ही अफूची गोळी आहे असा विचार करून माणसे हा विचार टाळत रहातात
         
अशापद्धतीन ज्यांनी  स्वभावात आणि वागणूकीत सकारात्मक बदल घडवले ते आजही संस्मरणीय आहेत
                       
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान



Thursday, August 16, 2018

सर्जनशीलता आणि उत्स्फूर्तता

सर्जनशीलता आणि उत्स्फूर्तता.

आपण एखाद्या कलाकार व्यक्तीबद्दल बोलताना सराईत पणे दोन शब्दांचा वापर करतो. होय तो कलाकार सर्जनशील आहे,त्याचा प्रतिसाद उत्स्फूर्त असतो.

काय आहेत हे दोन शब्द जे कलाकाराच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनून जातात. त्या कलाकृतीच्या लोकप्रियतेत एक मोठे काम करून तिला एका उंचीवर नेऊन ठेवतात. त्यातला सर्जनशील या शब्दाला creative असे इंग्रजीत म्हणतात. या ठीकाणी सृजन आणि सर्जन या  शब्दांच्या अर्थात. माणसे नेहमीच गल्लत करतात.कारण या दोन शब्दातील. अर्थफरकाच्या तरल रेषेकडे त्यांचे लक्षच नसते.

सृजन या शब्दाचा अर्थ उत्पत्ती तर सर्जन या शब्दाचा अर्थ निर्मिती.

उत्पत्तिचा संबंध नेहमीच निसर्गाशी जोडलेला आहे. तर सर्जन हा मानवाचा गुण मानतात..या अर्थामध्ये गल्लत झाल्या कारणाने त्याचे संदर्भ बदलतात. कलाकाराच्या किंवा माणसाच्या संदर्भात सर्जन हा शब्द जास्त चपखल ठरतो.

सर्जनात कायम नावीन्याचा ध्यास असतो.कारण सर्जन हा गुण माणसातील प्रतिभा शक्तीशी जोडला गेला आहे.  माणसाच्या डोक्यात अनेक कल्पना असतात.त्यांना त्या कल्पनेला विषयी जिव्हाळाही असतो.पण "how to project them." या वाक्याशी गाडी अडण म्हणजेच प्रतिभा शक्तीचा अभाव.जेव्हा," मला माहित आहे,माझ्या कल्पना कशा राबवायच्या"अशा वाक्यातून माणसाच्या सर्जनशीलतेची झलक दिसते.

थोडक्यात काय तर सर्जन हा माणसाचा गुण असला तरी त्याचे स्वामित्व बुद्धी कडे असते. त्यामुळे बुद्धि "सु" अथवा "कु"यापैकी कोणत्या उपसर्गाच्या संपर्कात येते त्यावर त्या कल्पनेचा विस्तार,आकार,आणि मांडणी हे अवलंबून असते. जेवढा विचार जास्त तेवढा सर्जनाचा आवाका मोठा. "निरीक्षण" हा गुण सर्जनाचा आधारस्तंभ असतो.जेवढे निरीक्षण कराल तितकी सर्जनशक्ती बलशाली होत जाते. ह्याचा वापर नेहमीच नाटक,चित्रपटातील कलाकार. करीत असतात.एखाद्या व्यक्तीचीखाद्या व्यक्तीची आवडलेल लकब,बोलण्याची पद्धत,उठणे,बसणे,चालणे यांच्या ढबींचाउपयोग योग्य आणि सयुक्तिक पणे करतात तेव्हा ती व्यक्तिरेखा रसिक आणि सामान्य या दोनही प्रकारच्या व्यक्तीना आवडते किंबहुना ती त्यांना आवडते म्हणून ती चिरकाल स्मरणात राहते.यालाच सर्जन असे म्हणतात

म्हणून "सर्जन" हा अंगभूत गुण आहे.तो निरीक्षणाच्या मदतीने फळतो फुलतो.

तर उत्स्फूर्तता (spontaneity) ह्या बद्दल विचार करायचा तर हा ही गुणच पण हा गुण ना अनुवंशिक असतो नाही अंगभूत ना जन्मजात हा गुण म्हणजे तुमच्या भाषाशक्ती,निरीक्षण शक्ती,आणि आकलन शक्तिचा परिपाक असतो. म्हणूनच या गुणाचे वर्गीकरण करताना "अभ्यासपरिपाक" गुण असे करावे लागेल.यात सहजता प्राप्त करण्यासाठी माणसाची परिपक्व बुद्धी कारणीभूत असते.उत्स्फूर्तता ही नेहमी प्रतिक्रीया किंवा प्रतिसाद अशा स्वरूपात येत असतो.

यासाठी निरीक्षणा बरोबर परिस्थितीचा विचार करावा लागतो. जडजंबाल चर्चा संपत असताना  अचानक हलकी फुलकी टिप्पणी ऐकली तर चर्चेचा सगळा शीण दूर होतो. हे सहज साध्य नाही वाचन,निरीक्षण,आकलन आणि परिस्थिती या सगळ्याचा परिपाक असतो.

हे दोनही गुण एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या सारखे पाठीला पाठ लावून येतात आणि माणसाच्या आयुष्य समृद्ध करून जातात.

- तृप्ती लोणकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Monday, August 13, 2018

श्रावण महिना


श्रावण महिना
                           
 
मासात मास श्रावण मास असे श्रावण महिन्याचे वर्णन केले जाते.पाहिले तर हिंदू वर्षाचा पाचवा महिना  या खेरीज श्रावण महिन्याची माहिती उपलब्ध होत नाही.मग श्रावण म्हणजे काय? या महिन्याला सर्वाधिक महत्त्व का दिल जात याच उत्तर शोधत असताना काही संदर्भ समोर असले.
                 
श्रावण महिना हा परंपरेने प्रमाणे पौर्णिमेला श्रवणनक्षत्र असताना आरंभ होतो. वास्तविक श्रवण या शब्दाचा ऐकणे हा अर्थ सर्व विदीत आहे. त्याच बरोबर श्रवण म्हणजे आजूबाजूला उगवणारे कोवळे गवत असाही अर्थ आहे. खरोखर किती चपखल अर्थ आहे.अगदी बालकवी देखील सांगतात
 
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
 
ज्याच्या नावातच हिरवळीचा आभास आहे असा निसर्ग सौंदर्याने नटलेला महिना म्हणजे श्रावण महिना
           
भगवान शिव ही या महिन्यातील आराध्य देवता असते.कारण देवशयनी एकादशी पासून सृष्टीची पालक देवता  भगवान महाविष्णू योग निद्रेच्या आधीन असतात.तर सृष्टीची निर्मिती देवता पितामह श्री ब्रह्मदेव चैत्रापासून काम करून अताच कुठे विसावलेले असतात.नवीन निर्माण झाल अाहे.जुन्याचा विनाश किंवा नाहिसे करण्याचा अधिकार हा भगवान शिवांचा.आषाढ महिनाभर अहोरात्र अव्याहत पणे कार्यरत असलेल्या भोळ्या सांबाला प्रसन्न करवून सृष्टीचा उत्पात थांबवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य ठरते.म्हणूनच शिवपूजन करून त्याला फुले,फळे,(शिवामुठी व्रताने)धान्य,जल अर्पण करून त्याची आराधना केली जाते.जेणे करून उत्पाताची तीव्रता कमी होईल.
 
असे म्हणतात समुद्र मंथनातून श्रावणमहिन्यातच चौदा रत्ने  निर्माण झाली त्या मधे अमृत तर आलेच पण हालाहल हे विष देखील बाहेर आले.  मानव हितार्थ ते नष्ट करण्यासाठी  शिवाने पिवून टाकले.त्याच्या या ऋणातून प्राणिमात्र कधीच मुक्त होणार नाहीत.त्याच्या विषयी कृतज्ञता म्हणूनच की काय श्रावण महिन्यात शिव व्रते करीत असतात.
               
श्रावणातील इतर व्रते  पाहता ती रक्षक व्रते आहेत.जिवतीका पूजन कुटुंब रक्षणासाठी,बुध-बृहस्पती पूजन बुद्धी आणि ज्ञान रक्षणा साठी.नाग पूजन हे धान्य तसेच प्राणीमात्र रक्षणा साठी. म्हणजेच जे निर्माण झाले आहे.त्याचे रक्षण शिवाने करावे कारण महाविष्णू योग निद्रेत आहेत. अशी माणसाची अपेक्षा असते.
 
व्यावहारिक दृष्टीने पहाताना श्रावण महिन्यात फारशी शारिरीक कष्टाची कामे नसतात.माणूस रिकामा असेल तर खाली दिमाग शैतान का घर या न्यायाने तो आपली चाकोरी सोडून सतत खणे-पिणे,ऐषारामी जीवन यावर अापले  लक्ष केंद्रित करेल. त्याच्या गाई-उशी-मम्मम या वृत्तीला आळा घालणे क्रमप्राप्त होते.म्हणूनच व्रत वैकल्यांची बेडी त्याच्या पायात अडकवली आणि त्याच्या मनाला बांध घातला. त्यानंतर परत शेतीची कामे सुरू होतातच त्यामुळे त्याचे चित्त त्या कामांवर एकाग्र होते.रिकामपणी कलह, मरामारी अशाही गोष्टींनी समाज जीवन विस्कळीत होऊ नये म्हणूनच की काय व्रत वैकल्यांची रेलचेल श्रावणात केली.
 
पूजन समारंभाने सामंजस्य टिकेल आणि दुराचाराला आळा बसेल अशाच शिव म्हणजे पावन विचारांनी शिव आराधना आणि व्रत. निसर्गातील उपद्रवी घटकांना देखील देवत्व बहाल करून  यांच्या साथीने निसर्ग निर्मित सामग्रीने देवतार्चन करीत निसर्गाचा आनंद घेणे माणसाला शक्य व्हावे हे श्रावणाचे काम आहे.
 
नियमित अर्थाने श्रवण म्हणजे ऐकणे म्हणून देवदेवतांचा महिमा ऐकवणारा महिना म्हणजे श्रावण
 
निर्मिती प्रक्रियेतील वाढ या क्रियेत साठी उपयुक्त असे सूर्याचे अधिष्ठानही या महिन्याबरोबर असते.म्हणूनच आदीत्य राणु बाई सारख्या सौर व्रताची साथ संगत घेऊन माणसाच्या जीवनात आनंदाची हिरवळ पेरणारा महिना म्हणजे श्रावण.
                 
- तृप्ती लोणकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Saturday, August 4, 2018

आकार

आकार

गाण म्हटले की सरगम घोटताना नेहमीच आकारात घोटायला सांगतात.सर्व सामान्य पणे आकार म्हटले की आपल्या समोर आकृती हा शब्द येतो. खरतर आकार ही चा गायनाच्या शास्त्रातील एक अस शस्त्र आहे.जे साधला तर ते गायकाला स्वर्गीय आनंद देत नाहीतर पूर्ण पणे धराशायी करून टाकत. काय आहे हा आकार?  स्वर लावण्याची पद्धत. होय आवाज तापवण्यास साठी सतत. सरगमाचस रियाज करण कदाचित कंटाळवाणेपणाच असत.त्यावेळी ओठ थोडे विलग करून आ या अक्षराने स्वरसाधना करणे म्हणजे आकार लावणे म्हटले जाते.
 
तानेची माळ गुंफताना  प्रत्येक स्वराचा मोती व्यवस्थित ओवण्याचा धागा म्हणजे आकार जेव्हा हे सर उलगडून लागतात तेव्हा श्रोत्याना ते आकारात लपेटत जातात.
 
आकार लावण्याच्या अनेक पद्धती आहेत.काही जण आSSSअसा स्वर लावतात तर काही जण नोSSम्  तोSSम् करीत स्वर लावतात.थोडक्यात कायतर तुम्ही अनुनासिक सोडून ज्या अक्षराच्या सहाय्याने स्वर प्रदर्शन कराल ते अक्षर म्हणजे आकार अस ढोबळमानाने म्हणता येईल.पण हे अक्षर निवडताना आणि त्याच प्रकटीकरण projection करत असताना "आ" हेच अक्षर योग्य वाटते.
 
कोणीही विचारेल केवळ "आ" हेच अक्षर का?याला उत्तर देताना थोड गाण्याच्या व्याकरणात शिराव लागत.जेव्हा "आ" या अक्षराचा उच्चार होतो.तेव्हा गळ्याच्या आतील भाग उघडल्याची जाणीव होते. स्वर घुमल्याचा भास होतो.  त्यामुळे स्वरकंपनात  कसलीही अडचण न येता सहजपणे तळ्यातून बाहेर पडतात.रियाजाने हे इतके सुलभ होते की जसे मोती दो-यातून ओघळतात तसे स्वर सहज सुलभपणे एकामागोमाग एक समान वजनाने  गायले जातात.
 
हा आकार एका चांगल्या गायकाची शक्ती असतो.तो साधण्यासाठी विशेष प्रयास करावे लागतात.काहीवेळा तर जिभ रूमालाने पकडून आकाराचा रियाज करतात.कालांतराने हा आकार सहज लागतो.नाहीतर ब्रह्मांडाची  आठवण करून देतो.
 
असा हा आकार माणसाच्या गायन कलेला आकार तर देतोच पण गायकाचे आयुष्य आकारात आणतो. म्हणतात ना -
 
"आकार घासा आकार लावा आणि रागाला आकार द्या"
 
आजचे आकार महात्म्य येथेच संपले रजा घेते. 
 
-तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

रियाज

 रियाज

अस म्हणतात गाता गळा आणि शिंपता मळा हा नेहमी चांगला असतो.होय गळा गाता ठेवण्यासाठी गायकाला रियाज करावा लागतो.  काय असतो हा रियाज. इंग्रजीत ज्याला प्रॅक्टिस म्हणतात.तोच रियाज तुम्ही त्याला सराव म्हणा किंवा काही म्हणा प्रकार तोच. 
 
गुरूने शिकवला सरगम जसाच्या तसा गळ्यात बसवायचे एक प्रभावी माध्यम म्हणजे रियाज.  रियाज करण्याची ही एक पद्धत असते. 
 
ब्रह्म मुहूर्ताला उठून नित्यकर्मे  आटोपून शूचिर्भूत होऊन रियाजाला बसावे.रियाजाला सुरवात करण्याआधी   सर्वप्रथम. प्राणायाम करून श्वास नियंत्रित करावा  त्या नंतर ओंकार ध्यान करणे आवश्यक असते.अोंकार उच्चारण करताना    दीर्घश्वास  घेऊन अ उ म् असे क्रमाने उच्चार करावे  अशी पद्धत आहे.यामुळे रात्रभरात जड झालेला गळा पूर्ववत होण्यास मदत होते. 
 
आता पेटी किंवा तानपूरा लावून साधारण पंधरा मिनिटांत पर्यंत. आपण ज्या पट्टीत गातो त्याच्या मध्य सप्तकातील "सा"हा स्वर लावावा."सा" लावताना प्रथम. दीर्घश्वास घेऊन सा म्हणजे षड्ज लावावा. असे करताना आवाजात थोडा कंप आला तरी नेटाने सा लावणे  चालू ठेवावे. पंधरा मिनिटांत नंतर तुम्हाला आवाज स्थिर झाल्याची जाणीव होईल त्या नंतर क्रमा क्रमाने वरच्या म्हणजे तार सप्तकाच्या षड्जा पर्यंत जावे.यालाच खर्जातील रियाज असेही म्हटले जाते.
 
जर गायकाचा खालचा सा,पंचम आणि वरचा सा  संवादिनी बरोबर जुळले तर त्याचा रियाज योग्य मार्गावर आहे हे कळून येते. त्यानंतर एखादा राग घेऊन त्याच्या आरोह अवरोहावर काम करावे.अगदी एक एक स्वर लावण्या पासून सुरवात करून त्याच सरगमाचे दोन स्वरांचा, तीन स्वरांचा,चार,स्वरांचा,एकस्वर सोडून असे अलंकार तयार करून स्वर घोटावे उदाहरणार्थ भूप राग गात असाल तर प्रथम
 
सा रे ग प ध सा नंतर
 
सा रे सा
सा रे ग रे सा
सा रे ग प ग रे सा
सा रे ग प ध प ग रे सा
नंतर
सरेग,रेगप,गपध,पधसां
 
नंतर चार स्वरांचा असे अलंकार ताला सहित घोटून रियाज करावा.त्या नंतर सरगम आकारात घोटावा पुढे तानांचा रियाज करताना एखादा स्वर सुटणे,कमी लागणे किंवा दम सास कमी पडणे या गोष्टींचा टाळता येतात.
 
दुसरे असे काही रागांमधे स्वर सरळ लावत नाहीत मागील स्वराची आस घेऊन लवण्यासाठी स्वर ज्ञान पक्के  असावे लागते.आरोह अवरोहाचे अलंकार तयार केल्याने स्वर अचूकतेने लागण्यास मदतच होते.
 
या नंतर रागाची चीज गावी त्यामुळे शब्दोच्चारण,ताल,आणि ताना यांचा अभ्यास होत राहतो.  हा स्वराभ्यास करताना. त्या रागाचे अंग दाखणा-या स्वर पद्धतीचा  रियाज खास असावा.  रागात गोंधळून जाणे होत नाही. जेणे करून काही सेकंदात गायक कोणता राग गाणार आहे हे कळून येते. 
 
असा केलेला रियाज साधारण दोन तास चालतो.त्यामूळे रोजच्या रोज स्वर घासले जातात.त्याचा प्रकाश गायकाच्या गाण्यातून श्रोत्यां पर्यंत. सहज आणि मधुर पद्धतीने पोहोचतो. अशाप्रकारचा स्वराभ्यास गाण्यातील अचूकता,सुस्वरपणा आणि आलप ताना या संकल्पनानी गाणे समृद्ध करते.गायकालाही आत्मानंदाची अनुभूती देतो.
 
गायन कला ही गोमुखी विद्या आहे.तिच्या मुखी शिरणे सहज शक्य असते.पण नंतर जर रियाज ठेवला नाही.तर गायक शून्यवत् होतो. अस म्हटले जात एक दिवसाचा रियाज चुकला तर काही हरकत नाही.दोन दिवसाचा रियाज चुकला तर तो फक्त गायकाला कळतो.आणि तीनदिवसांचा रियाज चुकला तर श्रोत्याना कळतो. या वरून कळून येते.सातत्याने सराव,स्वराभ्यासाला  रियाजाला गायनाच्या क्षेत्रात अनन्य साधारण महत्त्व आहे
 
-तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Friday, August 3, 2018

नांदी

नांदी

संगीत नाटक म्हटले की त्याची सुरवात नांदी ने होणार हा प्रघात आहे.रंगमंचाची झालेली पूजा, धूपाचा दरवळणारा मंद सुगंध आणि वर जाणाऱ्या पडद्यामागे सूत्रधार,नटी आणि समस्त नटगण वर्ग हात जोडून उभा असतो आणि ऑर्गनचे सूर तबल्याचा ठेका वाजायला सुरुवात नटेश्वराच्या,गणपतीच्या किंवा नाटककाराच्या आराध्य देवतेच्या स्तुती गायनाने होते.

हे गीत म्हणजेच नांदी या शब्दाची व्याख्या करताना-

नन्दन्ति देवतां अस्यां सा म्हणजे जी देवदेवतांना आणि रसिकदेवतेला आनंदीत करते ती नांदी!

नांदी ही संस्कृत नाटकाचा अविभाज्य भाग आहे.मराठी संगीत रंगभूमी वर जशीच्या तशी उचलली गेली.आणि ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक ठरली.

नांदी या गीत प्रकाराच्या रचनेत ईशवंदना, स्तुती, नाट्याभिनयाची थोडी तयारी, संगीताने प्रेक्षकांचे मनोरंजन आणि प्रयोगाला पोषक अशी वातावरणनिर्मिती, नाटककार आणि नाटक यांची प्रस्तावनारूप ओळख, प्रेक्षकांची आराधना असे पूर्वरंगाचे विविध उद्देश आहेत. त्यात नांदीचे कार्य ईशस्तवन, मंगलाचरण, संरक्षण-कुशलासाठी प्रार्थना हे आहे.

 व्याख्येप्रमाणे नांदीत देव, द्विज,(विद्वान कवी) नृप(राजा) इत्यादींची स्तुती आणि आशीर्वचन (आशीर्वाद)असते. नांदी ‘नित्य’ म्हणजे(बदल न होणारी) प्रत्येक प्रयोगारंभी म्हणावयाची असून तिचे स्वरूपही ‘नित्य’(सूर,राग,आलापाचा बदल न होणारा) म्हणजे ठरलेले असते, तसेच तो सूत्रधाराचा ‘पाठ’(म्हणायचे गाणे) असून पूर्वपरंपरेने आलेला किंवा गुरूपासून घेतलेला अथवा स्वतः रचलेला असतो. ‘परिवर्त’ या नांदीच्या आधी असलेल्या भागात सूत्रधार दोन पारिपार्श्विकांसह रंगमंचावर येऊन दिग्देवतावंदन, परिवर्तनी ध्रुवागानाच्या तालात व लयीत करतो.

नांदीचे गायन मध्य लयीत. आणि मध्यम स्वराला सा(षडज्) समजून करण्यात येते. ज्या योगे समूह एकत्रितपणे गीत गायन करतो.तर मुख्य गायकाच्या(आवाज तपवण्याचा व्यायाम असतो) आवाजाचा पोत पाहून पुढील पदांसाठी त्याचा स्वर सहज लागतो.
          
नांदी मधे ईशस्तवन असते.रंगकर्मीं साठी नटेश्वर म्हणजे शिवशंकर ही आराध्य देवता असते.म्हणून ईशानाचे पर्यायाने नटेश्वर रुपात शिवाचे स्तवन असते.
पण परंपरे प्रमाणे गणेश वंदन ही असते यासाठी संगीत शाकुंतलाची नांदी विचारात घेता
पंचतुंड नररुंड मालधर
पार्वतीश आधी नमितो


पाच तोंडांचा आणि ज्याने नररुंडांची म्हणजे कवट्यांची माला धारण केली आहे अशा शिव शंकराला प्रथम नमन करतो.
विघ्नवर्ग नग भग्न कराया
विघ्नेश्वर गणSपती मग तो


त्यानंतर नाट्यप्रयोगात येणाऱ्या अनेक विघ्नांचा पर्वत (असंख्य अडचणींचा डोंगर)दूर करावा म्हणून शिवा नंतर विघ्नहर्ता गजाननाची प्रार्थना करतो.
त्या नंतर अण्णासाहेब किर्लोस्कर नाटकाची पार्श्वभूमी सांगतात. कारण कालिदासाच्या प्रतिभाशक्ती पुढे आपण सामान्य असल्याची ग्वाही देत असता ते म्हणतात-
कालिदास कविराज रचित हे
गाने शाकुंतल रचितो


कालिदासाच्या काव्यकृतीचा मराठीत तो सुद्धा गाने म्हणजे काव्यात्मक रुपांतर करीत असल्याचे प्रेक्षकांना विदीत करतात पुढे ते म्हणतात-
जाणूनिया अवसान नसोनी
हे महत्कृत्यभर शिरी घेतो


अण्णासाहेब स्वतःच म्हणतात मी जाणतो कविराज कालिदासाच्या पासंगाला मी नाही. कालिदासाचे अफाट आणि प्रचंड, महान असे कार्य माझ्या आवाक्यात बाहेरचे काम असले तरी माझ्या सारख्या कडून हे काम होत असताना मी जणू डोक्यावर न पेलणारा भार घेतला होता.तरीही त्या महान अशा भाराने  झालेले  एक महान् कार्य आहे.पुढे ते म्हणतात-
ईशवराचा लेश मिळे जरी
मूढ यत्न शेवटी जातो


माझ्यासारख्या मूढमतीवर जर ईश्वराची लेशमात्र थोडीशी जरी कृपा झाली असेल तर हा गगनाला गवसणी घालण्याचा केलेला मूढ(बालिश) प्रयत्न देखील सफल होतो. म्हणून मी हे धाडस केले आहे पुढे ते सांगतात-
या न्याये बलवत्कवि निज हे
वाक्पुष्पी रसिकार्चन करीतो


मी केलेल्या मूढ यत्नाचे  ईश्वर कृपेने सोने होईल या न्यायाने.म्हणजे अशी परंपरा असल्यामुळे बलवंत नाटक मंडळीतील हा कवी स्वतःच्या कवन पुष्पांनी रसिक प्रेक्षकांचे पूजन करीत आहे.

ईश स्तवनापासून सुरू झालेली ही नांदी  मायबाप रसिकांच्या पूजनापर्यंत येऊन भिडते.यातून अण्णासाहेब स्वतः आपण केलेला प्रयत्न म्हणजे कालिदासाच्या काव्यकृती पुढे अत्यंत साधा असल्याची ग्वाही देतात.तर रसिकांना विनंतीही करतात हा माझा मूढ प्रयत्न म्हणजे मी माझ्या पदांनी देवाची आणि रसिकांची केलेली पूजा आहे.

थोडक्यात काय तर मी तुमच्या पूजेचा विधी जाणत नाही तेव्हा हे माझे बोल गोड मानून घ्यावे ही कळकळीची विनंती करतात.

अण्णासाहेब स्वतः गायनाचे जाणकार असल्याने त्यांनी ही नांदी खमाज रागात बांधली तर ताल म्हणून धुमाळी उपयोग केला.

नांदी गायनाचे साठी चतस्र तालाची म्हणजे ,८,१२,१६ अशा चार चार  मात्रांच्या विभागणीचे ताल उपयोगात आणावे या नियमाला अनुसरून धुमाळीचा  उपयोग केला आहे.कारण धुमाळी वाजवताना वातावरण भारून टाकण्याची ताकद त्या तालाची शक्ती आहे.

अशा प्रकारे शास्त्रशुद्ध आणि दिलखेचक रचना संगीत शाकुंतलाच्या आरंभी रसिक वर्ग ऐकत असतो. त्यामुळे पुढील. परिचित नाट्यकथे ऐवजी पदांची उत्सुकता मनात जागृत होते.

 ही नांदी नित्य आहे संगीत शाकुंतल हे नाटक १८८० साली रंगमंचावर आले आजतागायत नांदीतील आलापही कोणी बदलत नाहीत. अशा प्रकारची अवीट मोहिनी त्या सुरांत आणि शब्दांत साठून आहे.

-तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान