Friday, September 14, 2018

जेष्ठागौरी

जेष्ठागौरी
   
सन्मान अदायादा कन्यांचा
                            
विवाहित स्त्री कितीही मोठी झाली तरी तिची माहेरची ओढ काही कमी होत नाही.कदाचित हेच ओळखून परंपरेने जेष्ठा गौरी हे भाद्रपदातील लौकिक व्रताची सुरवात केली असावी.
               
कहाण्यांतून वृद्धबाईला दरिद्री ब्राह्मण घरी आणतो.तिला तृप्त करण्या इतकी साधनसामग्री त्याच्याकडे आपोआप येते.तिसऱ्या दिवशी ती वृद्धावस्थेत आपण जेष्ठा गौर असल्याचे सांगून स्वस्थानीं निघून जाते.ती स्त्री नदी जवळ भेटली म्हणून नदीच्या काठचे पाचखडे घरी आणण्याची प्रथा आहे.
              
प्रांतानुरूप गौरींचे स्वरूप बदलते असते.म्हणूनच हे व्रत लौकिक म्हणजे लोकाचारातून निर्माण झाले अाहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गौरी बसवण्यासाठी ,पूजा,हवन असे शास्त्रोक्त विधी नाहीत अगदी साधेपणाने गौरी बसल्या जातात.
             
काही ठीकाणी विहिरी पाणवठ्या वरून पाच खडे किंवा तेरडा,अंबा आशा पाच झाडांचा फुलोरा आणण्याची प्रथा आहे या गोष्टी आणताना कुमारिका किंवा लहान मुलींचे आधिक संख्येने असतात.
          
त्या फुलो-या वर मुखवटा बसवून गौर उभी केली जाते. तर काही ठीकाणी पितळी मुखवटे संपूर्ण घरभर फिरवून धन्याच्या राशी अगर धातूच्या कोठ्यांवर ते मुखवटे बसवले जातात. तेरड्याच्या  किंवा फुलो-याची गौरी  एकच असते. तर धतूच्या मुखवट्याच्या दोन गौरी असतात.
         
खरे पाहता गौरी म्हणजे पार्वती.ही हिमालयाची कन्या पण सांबसदाशिवाशी  विवाह झाल्यामुळे माहेराला दुरावली होती.त्यामुळे तीन दिवस मानाने माहेरवाशीणीस बोलावण्याची प्रथा तिला गौरी आगमन,पूजन आणि विसर्जन(बोळवण) म्हणत असावे.
         
संख्येने दोन असलेल्या गौरीना महालक्ष्म्या असे म्हटले जाते.त्यातील जेष्ठ अलक्ष्मी आणि कनिष्ठ महालक्ष्मी असे म्हणतात.
               
गौरींचे मुखवटे  ताम्हणात ठेऊन घरात काढलेल्या पावलांचा मागोवा घेत थाळी,घंटा वाजवत वाजत गाजत गौरीना घरभर फिरवले जाते.जणू माहेरवाशीण आपल माहेरचे घर डोळेभरून पहात असते.आपल्या नाचण्या-बागडण्याच्या दिवसातील जागोजागी असलेल्या आठवणीना उजळून अगदी लख्ख करून मग ती हुश्श म्हणत आपल्या जागी विराजमान होते.
          
वास्तविक पहाता दक्षाने सतीदेवींचा अपमान केल्यापासून विवाहितेला आपल्या माहेरी देखील विचार करूनच जावे लागते.त्यातून. माहेरची सत्ता हाती असलेल्या भावजया ह्या त्या घरातील गृहलक्ष्म्या असतात.त्यामुळे माहेर जरी आपले म्हटले तरी तिकडे सत्ता मात्र गृहलक्ष्मीची असते.त्यामुळे मनातल्या मनात धुमसणा-या या  माहेरवाशीणी अलक्ष्म्यांचे प्रतीक म्हणून जेष्ठा असावी.तिच्या रागा लोभासहित तिला स्वीकारून. मानाने तिचा पाहुणचार करून तिला  माहेरचे सुख देवून तिला शांत,हसतमुख करून महालक्ष्मी रुपात पहाणे  ह्या हेतूने प्रतिक म्हणून महालक्ष्म्यांची स्थापना होते.
             
दुसरे असे धर्माने मुलीला अदायादा म्हणजे स्थावर-जंगमातील कसलाही  वारसा न मिळणारी अशी ठरवली आहे. त्यामुळे आई वडिलांकडून किंवा भावा कडून विवाहोत्तर. मानसन्मान. मिळणे जरा दुरापास्तच याकारणाने कदाचित आईच्या पश्चात तिला माहेरपणाच्या सुखाला मुकावे लागेल याचा खोलवर विचार करून फक्त तीन दिवस मुलीला माहेरपणाला बोलवावे जेणे करून नाते संबंधात फूट पडणार नाही.आणि   आपल्याला आईवडीलांनी दूर लोटले ही भावनाही मनात घर करून राहणार नाही.आईच्या पश्चात जर भावजयीशी नाही जमले तर निदान तीन दिवसासाठी तरी तिला भावाची बहिण झाल्याचे समाधान देण्यासाठी ही प्रथा सुरू झाली असावी.
           
गौरी पूजनाच्या दिवशी तिला मानाने जेऊ-खाऊ घालून साडीचोळी केली जाते. या तीन दिवसा खेरीज माहेरवशीणीस माहेरी येणे दुरापस्तच असते.भाऊबीजेला भाऊ तिच्या घरी जातो.म्हणूनच जेष्ठा गौरीच्या निमित्ताने  अलक्ष्मी सारखा तिच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाचा ज्वालामुखी बाहेर काढून टाकून ती कनिष्ठांच्या गौरी सारखी शांत,सौम्य,परोपकारी होऊन सासरी जाईल असा साधा उद्देश असावा.
              
भाद्रपद महिन्यात शेतीची कामेही फारशी नसतात त्यामुळे मुलीला तीन दिवस माहेरी धाडण्यास सासरहूनही खळखळ होणार नाही.तसेच सगळा राग,संताप,असंतोष मागे टाकून शरीराने आणि मनाने शांत आणि स्वस्थ झालेली स्त्री आपल्या घरची महालक्ष्मी होऊन जाईल.त्याच प्रमाणे मिळालेल्या मान सन्माच्या वागणूकीने सुखावलेली ती आई,वडील,भाऊ-भावजयी यांच्यावर नाराज राहणार नाही. जेणे करून नाते संबंध दृढ होतील.आणि आईवडीलांनी आपल्याला दूर लोटले हा ही समज दूर होईल.
             
म्हणूनच गौर आणताना गौराई आली सोन्याच्या पावली असे म्हणण्याचा प्रघात असावा.
            
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment