Wednesday, January 9, 2019

गर्दीतली माणसं

गर्दीतली माणस
                               
                   सकाळी सात चाळीसची  ठाणा लोकल म्हणजे विविध स्वभावांच्या माणसांच्या  एक बेट होत.त्यात येणा-या माणसांचे स्वभाव पारखण्याचं मला वेड लागल होत.अगदी  वस्तू  विकायला येणाऱ्या बायका,मुली,डब्यातून प्रवास करणाऱ्या बायका सगळ अगदी कस रंगी बेरंगी होत.हवहवस वाटणार.

               याच गाडीच्या लेडीज डब्यात मला ती भेटली.

भारतीय महिला असतात त्याच उंचीची,रंग काळा म्हणता येईल असा.पण मेकपच्या सहायानं तो सावळेपणाकडे झुकवला गेलेला.
दिसताना ती सुखवस्तू घरातली दिसायची.  रुपगर्विता म्हणता येणार नाही पण नाकीडोळी नीटस होती. उत्तम पगाराची नोकरी असावी असे अंगावरील कपड्यावरून वाटत होते. कोणी काही आणल,नवीन खरेदी केली असं सांगताच मलापण असचं हवं होत ग.पण आमच्या घरी म्हणजे अंधारच सगळा.

                एक दिवस ती जरा नाराजीनच अाली होती.काय झाल विचारताच.माझ्या भावजईनं जागा घेतली.तीन बेडरूमची.मला मात्र फक्त वन बेडरूमचे घेऊन दिली.हे तिच्या नाराजीचा कारण समजले होत.

   "अग तुम्ही दोघे मिळवते आहात घ्याल की तुम्ही ही एक सखी म्हणाली.
आमच्या घरी सगळाच अंधार आहे.अस म्हणून ती रुसका चेहरा करून बसली.हिच्याकडे राहायला घर,उत्तम नोकरी,सगळ असतानाही तिच्या चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले. धमाल समूहातला हा धमाल नमुना म्हणजे अगदी नजरेत भरण्या सारखा होता. काही विनोद झाला तरी ओठांची इस्त्रीची घडी किंचित हलेल पण नंतर परत अगदी चपखल बसेल इतकी कडक की ही घडी मोडली असेल अशी शंकाही येणार नाही.

                तिला बोलताना जीभ आडवी घालून बोलायची सवय होती. काही झाल की हे  आमच्या नशीबी कुठे? अस बोलून इतर वेळी बंद कडक इस्त्रीच्या तोंडाने बसणारी ती सासू,घर,मुलं,बचत हे विषय आले की एखाद्या धबधब्या सारखी बोलू लागे. विशेषकरून सासू आणि नणंदा हा तिच्या तक्ररींचा सुर असे. कोणी त्या विषयी चांगल बोललं तर ती  तोंडाचा चंबू करून अय् Sया अस एका  विशिष्ट लकबीत म्हणत असे ते बाकी इतक छान वाटे की या लकबीवर तिचा नवरा नक्की फिदा झाला असेल अस वाटून जाई.पण असे क्षण फारच कमी येत असावेत कारण ही कायम आपली रुसक्या गौरीसारखा लांब. चेहरा करूनच बसलेली असे.

              मनात येई ,असेल काही विवंचना सतत त्याचा विचार करीत असेल अस म्हणून दुर्लक्ष करीत सगळ्याजणी.

                 मे महिन्याचे दिवस होते.ब-याचजणी इकडे-तिकडे फिरायला गेल्या होत्या आमची धमाल समूहाची संख्या अर्ध्याने घटली होती.तरीही ज्या मुंबईत होतो त्या सात चाळीस गाठत होतो.

                 रोजचे विषय नव्हते बरेचदा विषय पर्सनल होत होते.तेवढ्यात कोणीतरी सासूबाई किती चांगल्या आणि नणंद किती मदत करते असा काहीतरी विषय सुरू झाला.

                  तिला काय झाल कोण जाणे तिच्या इस्त्रीची घडी मोडली सासू कशी वाईट ह्याचा पाढा वाचायला तिनं सुरवात केली.
अग!माझा मुलगा दहावीला आहे.त्यामुळे त्याच्यासाठी केबल वर्षभर बंद करायच ठरवल तर ती म्हातारी मला म्हणते "मी काय करायच दिवसभर" माझा मुलगा आहे. त्याला कमी मार्क मिळाले तर ही थेरडी काय करणार.अस काय डबोलं घेऊन आली आहे का? रहायला तर क्वार्टर्स् च आहेत.मी ,माझ्या माहेरच्यानी मदत केली म्हणून घरात चार गोष्टी दिसतायत.ती आणि तिच्या त्या मुली मला शिकवतात.आज मी आणि माझे आई-वडील,माझे भाऊ आहेत म्हणून हे अाहेत.मग माझ्या समोर गमजा कसल्या मारते. अग माझ्या भावांनी आणि वडिलांनी मदत केली म्हणून मी घर माझ्या पैशाने घेतल.तिला आणि तिच्या मुलाला स्वतःच छप्पर मिळाल.

                  मे महिन्यात जाते आपल्या लेकीकडे निघून तेव्हा माझी आई आणि वडीलच येतात मुलाकडे लक्ष द्यायला.तिला कळत नाही  माझ्या मुलाची शाळा सुरू होते.

               मुलगाही असा आहे तिचा की लवकर. जातच नाही आणायला.तिची मुलगी फोन करते अजून आठ दिवसानी येईल थेरडी.

                    मी आवाक् झाले होते.रागात असल तरी इतकं बेताल बोलणे,आणि सासूबाईंच्या विषयी थेरडी,म्हातारी अशी विशेषण ऐकून मला विचित्र वाटत होत.  सखी आपल्या आईचा राग आल्यावर अशीच बोलत असेल का?त्यात मी माझं माहेर,माझे भाऊ,माझे आई-वडील हे सतत ऐकून माणूस. विटून जाईल मग तिच्या सासूबाई काय करतील. सखीचा नवरा  हे नामुष्कीचं जीणं कस जगत असेल.
लोकव्यवहार आणि नामुष्की यांनी त्याच काय होत असेल.बर तिच्या सांगण्या नुसार रहायला क्वर्टर्स् आहेत म्हणजे तो एकतर सरकारी नोकरीत असावा किंवा एखाद्या उत्तम कंपनीत मग हिच्या बोलण्याने तो दुखावला जात नसेल का? त्याला त्याचा स्वभिमान नसेल का? कोणती आई आपल्या मुलाला बोललेल ऐकेल?कोण मुलगा निगरगट्ट होऊन हे सगळ सहन करेल?असे एक ना अनेक प्रश्न मनात येत होते.सगळ्यात महत्त्वाच म्हणजे मी एकच बाजू ऐकत होते या गोष्टीला दुसराही पैलू असेलच की. तो समोर येईल का?

                  कदाचित मुलीवरच्या अति प्रेमापोटी माहेरहून अतिढवळाढवळ होत नसेल कशावरून?  किंवा सखीच्या असमाधानी आणि स्पर्धाखोर स्वभावामुळे ती सतत माहेरी आपल्या संसारातील कमतरता बोलून दाखवत असली तर तिच्या आई-वडिलांना गिल्ट येऊन तर असे वागत असतील का? या प्रश्नांना माझ्याकडे उत्तर नव्हती,आणि ती मिळण्याची शक्यताही नव्हती.तेव्हा अनुमानावरच काम चालवावी लागणार होत.

                   बहुतेक तिला कुटुंबाची महत्त्व आणि नाते संबंध राखायचे कसे हे कळलेलं नसणार.त्यात जर माझे माहेर, पगार,पैसा,असा मीपणा कोण सहन करील.

                तिला तिच्या म्हणण्या प्रमाणे घराने हलावे बोलावे,खावे,
प्यावे असे वाटत आहे.ते कसे पूर्ण होणार.पण काही बोलणे इष्ट नव्हते.

                  त्या दिवशी ती ट्रेनला चढली अगदी आनंदात होती. पर्स मधून तिनं पेढ्याचा बाॅक्स काढला माझा मुलगा पास झाला! पास झाला! अस सांगत ती पेढे वाटत होती.

                    एका थोरल्या सखीन तिला विचारल किती मार्क मिळाले.८५%तिन खालच्या आवाजात सांगितले. "अग घरादाराला वेठीला धरून इतकेच" मला वाटले ९९%मिळतील काय मिळवलस ग!सासूला वेठीला धरून आणि आता जा तुझ्या माहेरून ते सुधारता आलं तर बघ.नाहीतर सांग तुझ्या भावांना त्याला कमी मार्क मिळालेत ते थोडे वाढवून द्यायला.

                    अग आमच्या आॅफीसातला शिपाई आहे.त्याच्या मुलाला चाळीतल्या खोलीत राहून सतत असलेल्या गोंधळात अडचणीच्या एका खोलीत राहून ८६%मिळालेत.ते कौतुकास्पद आहेत की तुझ्या मुलाचे ?
तिचा पडलेला चेहरा मला दिसला,डोळ्यात जमा झालेले अश्रू ही दिसले पण ते पुसायला कोणीच पुढे होत नव्हत. तिच्या अहंपणाला औषध नव्हत. कारण तिच्या माहेर कडून तिला धक्का बसल्या शिवाय तिला आपली चूक समजणार नव्हती.

                     त्या दिवशी आईच्या सांगण्याचं महत्त्व पटलं.

कमीपणा आला तरी सासर धरून ठेवावं,नणंद,दीर,जावा आपल्या मानाव्या. तोंड जरा बेतानं सोडावं माहेर आयुष्याला पुरत नाही आणि मैत्रिणी आरसा असतात हे पुन्हा नव्याने पटल.

                आईला मनापासून नमस्कार केला.
तिनं आपल्या केवळ बोलण्यातून नाही तर कृतीतून मला हे दाखवलं होत.
                          
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषाप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment