Wednesday, January 9, 2019

गर्दीतली माणसं

गर्दीतली माणसं
                         
                 माझ्या हातात पुस्तकांची भली मोठी बॅग होती,स्टेशनला पोहोचले तो ट्रेन लेट. काय कराव सूचत नव्हत.तेव्हा बाजूने जाणाऱ्या दोघीजणी ७.४०च्या ठाणा ट्रेनने डाऊन-अप करून जाणार अस बोलत गेल्या. महाजनो येन गतःस पन्थः म्हणून मी बॅगेच ओझ वहात त्यांच्यामागे गेले.

                 व्ही.टी.कडून ठाण्याकडे जाणाऱ्या रिकाम्या ट्रेन मधे मी बसले होते.ही ट्रेन परत ठाणा व्ही.टी. होत असे.मी प्रथमच असा प्रवास करीत होते.फार सुखावह वाटत होता हा प्रवास .

            याच गाडीत मला शैलूताई भेटल्या.अगदी शांत,सौम्य चेहरा पण एक प्रकारचा रुबाब त्यातून दिसत असे,बोलणे इतक लाघवी की त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला नकार देताच येत नसे.
           साधारण पाच सव्वापाच फूट उंची रंग गोरापान चेहरा,त्या चेहऱ्यावर. आत्मविश्वास,आणि,निश्चय मुक्कामाला आहेत हे जाणवे. काळानुसार रहाणीमान असल तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातल आई एलिमेंट लपत नव्हत. सौम्य रंगाची काॅरपोरेट लुकची साडी,गळ्यात साधारण मध्यम जाडीची चेन, कानात सोन्याचे फॅन्सी टाॅप्स् , हातात एसबेडाची बॅग असा साधा पण उच्चराहाणीमान दर्शवणारा पेहराव.केस व्यवस्थित यू कट करून पीन ने बांधलेले.असले तरी त्यांच्या चेहऱ्याला ते सुट होत होते. त्या मला सांगत होत्या.आमचा एक ग्रुप इकडे बसतो. आम्हाला एकत्र प्रवास करायचा असतो.तेव्हा तुम्ही दुसरी कडे बसाल का?मी उठून वर ठेवलेली बॅग काढयला लागले ते पाहून त्यांना काय वाटले कोण जाणे त्यांनी मला तिकडेच बसण्याची परवानगी दिली,आणि मला धमाल समूहाचे  सदस्यत्व मिळाले.

                मीही त्यांच्यात गुंतून गेले होते. मी आता रोजच डाऊन-अप करून जात होते.ओळख वाढत गेली माझी जुजबी माहिती या सगळ्या ग्रुपला  मिळाली.

                  त्या दिवशी शैलूताई उशीरा आल्या कारण दुस-या दिवशी त्यांचा पन्नासावा वाढदिवस होता.सगळ्या समूहाने त्यांना सरप्राईज द्यायचे ठरवले होते.मला पण जायचं होत पण अचानक सेमिनार लागल्याने मला जाता आल नाही.

                   त्याच दिवशी मी संध्याकाळी पाच वाजता सेमिनार संपवून. एशियाटीक च्या पाय-या उतरून खाली आले तो मागून तृप्ती तृप्ती अशा हाका ऐकू आल्या मागे शैलूताई उभ्या होत्या.
"अग इकडे काय करतेस!" त्यांनी विचारल.
"मी पी.एच.डी.करते आहे. सेमिनार होत.म्हणून आले होते" मी त्यांना सांगितले.
अग तुला वेळ आहे का?चल काॅफी घेऊ.
चला मला आज गिरगावातच जायचं आहे.अस म्हणून आम्ही दोघी हाॅटेलात गेलो.
इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या.
तृप्ती मला तुझ बाळ गेल्याच कळलं खर आहे का ग?मी ग्रुपमधे ऐकल. होय मी म्हटले.अग किती बॅलन्सपणे सांगते आहेस.काहीच वाटत नाही का ग?वाटत ना शैलूताई पण रडत बसून काय होणार?माझ्यामुळे घरातली माणसं हवालदिल होतील.घराची घडी विस्कटेल त्रास तर होतोच पण अभ्यासाने सावरलेला मला.खर आहे ग!आयुष्यात एकदम येणार रिकामपण काय असत ते मी स्वतः अनुभवलय ग!

            तुला माहित आहे माझ लग्न झालेल नाही.अस म्हणण्यापेक्षा मीच ते केल नाही अस म्हणावे लागेल.

मला शिक्षणाची आवड होती.बाबांनी मला बी.ए.पर्यंत शिकवल. घरात आम्ही सहा माणसं आम्ही दोन बहिणी,दोन भाऊ आणि आई-बाबा बाबा सचिवालयात कारकून होते.आई घरातच असे.चार चार मुलांची शिक्षण खूप ओढाताण व्हायची आई-बाबांची    आमच्या शेजारी जोशी काका रहायचे एक दिवस ते म्हणाले शैले बी.ए. होऊन घरात काय बसतेस.माझ्या आॅफीसात व्हेकन्सी आहे.चल मी चिकटवतो तुला! मी ही हुरळून गेले.मला नोकरी मिळणार मी बाबांचा सपोर्ट होणार.अशी स्वप्न घेऊन कस्टमस् डिपार्टमेंट मधे लागले.

               खरच त्यानंतर बाबांचं ओझं डोक्यावरून खांद्यावर आल मी त्यांच्या बरोबरीने जबाबदारी वाटून घेऊ लागले.भावांची शिक्षणं व्यवस्थित चालू झाली.

                       आईनं माझ लग्न व्हावे म्हणून हालचाली सुरू केल्या.मला असा जोडीदार हवा होता जो माझी जबाबदारी वाटून घेईल पण या अपेक्षेमुळे सगळे मुसळ केरात गेले.कोणीही  माझी जबाबदारी वाटून घ्यायला तयार नव्हता.प्रत्येकाला बायको हवी होती पण तिची जबाबदारी नको होती.मी ही पर्वा केली नाही. एकाने तर चक्क सांगितले तुमच्या पगारातले पैसे द्या पण जबाबदारी नको.तर एक म्हणाला लग्न झाल्यावर तुम्ही आमच्या होणार म्हणजे तुमचा पैसाही आमचा पण वडिलांची जबाबदारी आमची नाही.

हे सगळ पाहून बाबांना चक्क सांगितले सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या की मग माझ्या लग्नाचा विचार करू.

              इकडे नोकरीत पगार मिळत गेला.माझी आई अचानक अजारी पडली.तेव्हा तिची शुश्रूषा,घरकाम,  नोकरी यात मी दंग होते.पण आई फार राहिलीच नाही.तेव्हा मी बाबांचा आधार झाले.बाबाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून राहू लागले.तो पर्यंत मी वयाच्या चाळीशी जवळ आले होते.लहान बहीण लग्नाच्या योग्य झाली होती.भाऊ शिकून योग्य मार्गाला लागले होते.

              मीच पुढाकार घेऊन बहिणीच लग्न करून दिल.भावांची लग्न करून देताना माझ न झालेल लग्न नकाराची कारण होत होत.त्या वेळी जोशीकाकांनी सांगितल्या प्रमाणे मी ठाण्याला  जागा घेतली.आता माझी जबाबदारी भावांवर नाही.हे निश्चित झाल.त्यांची लग्न झाली त्या नंतर सगळ चित्रच बदलल.

                 ताई तू खूप केलस आमच.असं म्हणणारे भाऊ उपकार केले नाहीस अशी भाषा करू लागले.  ताई आमच्या संसारात डोकावता कशाला. अशी शेलकी वाक्य मला ऐकवली जायची.बाबा मात्र माझ्या मागे ठामपणे उभे होते.एक दिवस दोनही भावांना बोलावून बाबांनी दुसरी घरं बघा ही गिरगावातली जागा मी शैलूच्या नावाने केलीय हे सांगताच.मी काहीतरी मोठा गुन्हा केल्यासारखे वातावरण तयार झाल.मी कानकोंडी व्हायची त्यावेळी पण बाबांकडे बघून मी सहन करत गेले.बाबांनाही बदल जाणवत होता.ते मनातून खचले होते.

                  ते सतत म्हणत शैले मी तुझ नुकसान केलं ग!अशी निखातरी मूल मी जन्मालाच घातली नसती तर बर झाल असत.याच गोष्टीची टोचणी लागून त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.मी अगदी एकटी झाले होते.शेवटी जोशी काकाच मदतीला आले.त्यांनी गिरगावातली जागा भाड्यान दे आणि ठाण्याच्या जागेत राहायला जा असा सल्ला दिला.

               मी ठाण्याला आले माझ स्वतंत्र एकटीच आयुष्य सुरू झाल.सणवार,कार्यप्रसंगी मला वरवरच बोलावणं येऊ लागल.फक्त पैशाची अडचण आली की ताई आठवत होती. मी गिरगावातील घर भाड्याने दिले होते.ते भाडे  एक महिना एका भावाला तर दुस-या महिन्यात दुस-या भावाला देत होते.ते दोघेही हक्क असल्यासारखे ते घेऊन जात असत.  "काय करायचेत ताईंना पैसे आहे कोण खायला?आमचच आहे सगळ!" असे ऐकू येऊ लागले होते.मीही मनातून भावंडांपासून दूर जात होते.त्यांच्या माझ्यात मायेचे बंध अटले होते.मला एकदम रिकामपण आल होत.

            जोशी काका मला आधार देत पण तेही थकत चालले होते. मी प्रमोशन घेतल.काम वाढवल. पण अजून दहा वर्षानी मी काय करणार ग!आज मी पन्नास वर्षाची झाले. तुम्ही सगळ्यामुळे माझ वयाने मोठं होणे साजर केलतं.मी तुलाच शोधत होते.तू अशी भेटलीस बघ.

              मी सुन्न झाले होते.मी शैलूताईंना म्हटल शैलूताई उद्या हाफ डे घ्या.मी तुम्हाला दुपारी दोन वाजता भेटते. दुस-या दिवशी मी शैलूताईंना श्रद्धानंद महिलाश्रमात घेऊन गेले.मी तिकडे जाऊन महिलांना शिकवायला जात असे.शैलूताईंना येणारे विणकाम,भरतकाम त्या बायकांना शिकवाल का? असे मी म्हणताच त्यांचे डोळे वेगळ्याच आशेन चमकत होते.

               मला खूप दिवसानी शैलूताई आश्रमात भेटल्या पण पहिल्या शैलूताईं म्हणजे शांत,गंभीर,माफक हासणा-या.आताच्या शैलूताई उत्साहाचा खळखळता झरा होत्या.आता त्यांना दहा वर्षानंतरची चिंता नव्हती किंवा भाऊ आपल्याला विचारतील किंवा नाही याची विवंचना नव्हती.त्यांना त्यांच फुलपाखरी विश्व मिळाल होत.त्यात त्या रंगून गेल्या होत्या.

          मला त्यावेळी शैलूताई एखाद्या तपस्विनीने सारख्या दिसल्या.त्यांच्यातल्या आई एलिमेंटची परिपूर्ती झाल्यामुळे त्या खूप खूश वाटत होत्या. माझे डोळे पाणावले होते.मी पटकन तिकडून निघून गेले.

माझ्या पाठीवर शैलूताईंचा आश्वासक हात फिरला. त्या जणू म्हणत होत्या मी आहे की अशी डळमळतेस काय?चल पुढे जा!

- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment